04/06/2019
Matkasur,, Tadoba
===============
Nikon D4S,VR 800mm f/5.6
1/2500s; f/8
ISO-640, -1.7EV;
08.05.2019
#मराठी_नाव -: वाघ
#इंग्लिश_नाव -: Tiger
#शास्त्रीय_नाव -:. Panthera tigris
वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात. मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात.
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मंचुरिया चीन, आग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतीस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. आज प्रामुख्याने जंगली वाघ हा भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया या देशात आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर सर्वत्र पोहोचले आहेत व वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहे. जंगली वाघातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत.
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत.
हिमालय व तराई विभाग - यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, उत्तरप्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम अरुणाचल प्रदेश व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
अरावली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे यात रणथंभोर सरिस्का सारखी राष्ट्रीय उद्याने येतात. सुंदरबन व ओडिशा.
मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व येथे आढळते. यात कान्हा, बांधवगड, मेळघाट(गुगमाळ्), ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
सह्याद्री व मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. बंदीपूर, मदुमलाई पेरियार इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.
वाघाचे वसती स्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात आहे. वाघाच्या शिकार पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतीस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबन मधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले)
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता २२२६ झाल्याचे सांगण्यात येते.तसेच, मध्य भारतातील, ताडोबा,पेंच,कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.
वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणासाचे ठसे वेगळे असतात त्याच प्रमाणे. यावरून वाघांना ओळखता येते. परंतु जंगली वाघ दिसायला मिळणे ही दुर्मिळ घटना असते त्यामुळे ही पद्धत अजूनही ग्राह्य ज़लेली नाही.
वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सद्रुश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाचे पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात.शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुबुंन स्वता:ला थंड ठेवतात.
वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रिडा ही पहाणार्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो. समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म देते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई व भावंडांसोबत दोन ते अडिच वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेली शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पुर्ण वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना सोडून निघून जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. वाघांचे बंदीवासातही वीण चांगली होते.
वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचे ओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेल्लरने तसेच वाल्मिक थापर यांनी अश्या नोंदी नोंदवल्या आहेत.
वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.
वाघ हा पुर्णत: मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पुर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमीनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: रानगवा, चितळ, भेकर व इतर हरणे, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पुर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत तसेच पिल्ले आपल्या वाढत्या काळात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित पण शिकार करतात.
वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्ती जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगेच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पुर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाई पर्यंत धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरुन जाते. एकदम छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो.
भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा ह्रुदय बंद पडून झाडाखाली पडतात. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेउन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` चंगीज´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटात आहेत.वाघ शिकार साधल्यावर शिकार ही मुख्यत्वे लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वले, तरस खासकरून गिधाडे इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकार्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून आतडी पुर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरु करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.सामापत.
#उपप्रजाती -:
वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वात स्थानिक परिस्थितीनुसार सर्वांच्यात बदल घडले आहेत. मुख्य फ़रक हा आकारमानात व थोड्याफ़ार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादी आहे.
#इंडोचायनीज_वाघ_अथवा_कोर्बेट्टी_वाघ -: ही वाघाची उपप्रजाती ईशान्य अशिया मध्ये दिसून येते. यात कंबोडिया, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंड, व्हिएतनाम, इत्यादी देशात आढळते. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रंगाची असून आकार लहान असतो व नराचे वजन १५० ते १९० किलो पर्यंत भरते. माद्यांचे वजन ११० ते १४० किलोपर्यंत असते. साधारणपणे एकून १००० ते १८०० वाघ वन्य अवस्थेत असल्याचा अंदाज आहे. यांचे सर्वात जास्त आढ्ळ मलेशिया मध्ये असून ते चोरट्या शिकारीवरील कडक नियंत्रणामुळेच शक्य झाले आहे. व्हिएतनाममध्ये या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर चीनी औषधांसाठी शिकार झाल्याचे कळते.
#मलेशियन_वाघ* -:
(Panthera Tigris Malayensis) हे फ़क्त मलेशियातील द्विपकल्पात दक्षिण भागात आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटी पेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. आजमितीला साधारणपणे ६०० ते ८०० वाघ असण्याची शक्यता आहे. हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर विराजमान आहे.
#सुमात्रन_वाघ -:
हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढ्ळून येतो व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ ७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे. जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा -हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
#सायबेरीयन_वाघ -:
ही प्रजाती पुर्व रशियात आढळून येतेह्, याला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर् चीनी वाघ असेही म्हणतात. पुर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या पुर्व सायबेरीयातील प्रांतातच वास्तव्य मर्यादीत राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत. सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामुळे अमुर ला सर्वाधिक वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे. सायबेरीयन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र ही खूप जाड असते व रंगाने थोडा हलका असतो.
#दक्षिण_चीनी_वाघ -:
ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चीनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतकर्याने वाघ दिसल्याचे सांगितले. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चीनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चीनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फ़क्त संग्रहालयात आहेत.
#पांढरा_वाघ -:
ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक् आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढर्या वाघाचे वंशज आहेत. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पुर्णत: प्राणी संग्रहालयातच जन्मलेले आहेत.
#वाघाच्या_नामशेष_प्रजाती #बालि_वाघ -: Panthera Tigris Balica
#जावन_वाघ -: Panthera Tigris Sondaica
#कॅस्पियन_वाघ -: Panthera Tigris Virgata
#वाघ_मानव_संघर्ष -:
भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतिक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारी साठी् मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहुबाजूने वेढा देउन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामिल होत तसेच बरेच हत्ती,घोडे असा ताफ़्याचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार हा फक्त राजे लोकांपुरते मर्यादीत होता. ब्रिटीश काळात वाघांच्या शिकारीत अमूलाग्र बदल झाला. बंदूकीसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दूरुनही वाघांना टिपता येउ लागले व वाघांच्या शिकारीचा काळ सुरु झाला. ब्रिटीश काळात खास वाघाच्या शिकारी साठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (So Called) महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर मचाणवर बसून करत अथवा हाकारे देउन् साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिकार्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतीस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, औद्योगिकरण, रस्ते, घरणे, गावे वसलेली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटीशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकीसाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे सुद्धा समाधानाची बाब आहे.
#नरभक्षक_वाघ -:
जो वाघ माणसांनाच आपले नेहेमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकुन एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. नरभक्षक वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण बऱ्याच काळापासून सतावत आहे. सुंदरबनातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खार्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील भीमाशंकरच्या जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता.
#चीनी_औषधे -:
वाघाच्या शरीरातील विविध भागांचा चीनी औषधातील वापर
चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा चांगला उपयोग होतो असे वाटते. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही. वाघाच्या मांडीची हाडे, इतर हाडे, सुळे, वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे शिश्न हे नपुंसकतेसाठी औषध असल्याचे मानतात. चीन मध्ये कायद्याने वाघांचे शरीराचे भागांची खरेदी विक्री कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
भारत, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंडमधील वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चीनी गि-हाईकांच्या साठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैश्याच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी चोरटी शिकार कमी होईल अशी आशा आहे.
#भारतीय_संस्कृती -:
वाघाला देवीचे वाहन म्हणून स्थान मिळाले आहे.
वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रुपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्त्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होउ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिक असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. महाराष्ट्रातील राजकिय पक्ष शिवसेनेचे प्रतिकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्द्ल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात.
#संरक्षण_उपायोजना -:
भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. भारतातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे इत्यादी.
#भारत -:
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत भारतात केवळ १८०० वाघ आढळले. काहींच्या अंदाजाप्रमाणे २० व्या शतकाच्या सुरूवातीला १ लाख तर ब्रिटीश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. ब्रिटीशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली तोच प्रघात ब्रिटीश गेल्यानंतरही कायम राहिला. वाघाची कातडी, नखे हे काही प्रमाणात परकीय चलन मिळवून देत होते. परंतु वाघांची चिंताजनक परिस्थिती पाहून वन्यजीव रक्षकांनी या हौशी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्याच प्रमाणे कायद्यानेही साथ दिली. कातडी निर्यातदार याच्या विरोधात उभे राहिले. १९७२ मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललेल्या खटल्यामध्ये वाघांच्या चिंताजनक संख्येचा आढावा घेत वाघांच्या शिकारीविरुद्ध निकाल दिला. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे असे या निर्णयात शिक्कामोर्तब झाले. या नंतर भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झाले जे लगेचच १९७३ मध्ये जारी झाले. या नुसार भारतात व्याघ्रप्रकल्पाला चालना मिळाली.
व्याघ्रप्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पा अंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्रप्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. ६०च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणार्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कूतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पुर्वीच्या हाडाच्या शिकार्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगीरी बजावली. १९९० पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले. भारतात वाघांची ४५०० ते ५००० पर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर भारतात वाढलेली संख्या व जगातील इतर भागात अजून कमी झालेली वाघांची संख्या यामुळे आंतराष्ट्रीय माफियांचे याकडे लक्ष वळाले व चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले. २००३ ते २००८ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक झाले व भारतात २००८ मध्ये केवळ १३०० वाघ उरले आहेत. चोरट्या शिकारींच्या उपद्रवामुळे नुकतेच आसाम सरकारने याचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांच्या सुरक्षिततेचा जिम्मा लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
#रशिया -:
रशियातील सायबेरीयन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन सोविएत संघाने संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरीयातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरीयन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरीयन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे.
#चीन -:
माओवादी धोरणे तसेच चीनी औषधे यांमुळे वाघांचे चीनमधील अस्तित्व संपुष्टातच आले. वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चीनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चीनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना साऊथ अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले. बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चीनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन होईल अशी आशा आहे.
#वाघांचे_महत्त्व -:
निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्ग चक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज आपण जागतिक तापमानवाढीने पहातच आहोत. बऱ्याच गावात मनुष्य आणि प्राण्यांमधले भांडण खूप दिसायला भेटतात.