10/07/2022
यंदा वारीला गेलो आणि दोन ओळींचा अर्थ उलगडला - सुखासाठी करिसी तळमळ, तरि तू वारीस जाय एकवेळ.
घरात विठ्ठलभक्त खूप होते आज्जी बाबांकडून कायमच पांडुरंगाच कौतुक ऐकलं होत. माफ करा माऊली पण मला विठ्ठल फारसा कळला नव्हता कधी. हया वेळी वारीला जाणं केल आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात साधी माणसं पाहिली . लाखो वारकरी हे लोणंद गावात थांबलेले होते सगळ्यांचे संसार रस्त्यावर पण आनंदाने बाहरलेले.बसायला गोणी, पाऊस आलातर डोक्यावर तीच गोणी, आणि रात्री अंथरुण पांघरूनही तीच. बाकी ऊन वारा पाऊस यापासून सांभाळायला जणु हया वेड्या भक्तांचा पांडुरंगच उभा होता. जून चा महिना आणि एकदाही हया वारकऱ्यांवर वरुणराजा कसा बरं बरसला नाही आणि बरसला असता तरी यांचं कुठे पाहणं यांना कशाने फरक पडतोय व्हयं? रक्ताने माखलेले पाय सुद्धा वारी चालतच होते. यांच्या डोक्यावर मायबाप विठ्ठल, खांद्यावरच्या उपरण्यात भाकरी, आणि गळ्यातल्या रुमालाला पाण्याची बाटली आणि हातात भगवा झेंडा यांच सगळं यातच आलं. कुठून येत असेल बरं अशी श्रद्धा आणि भक्ती? फोटोतली आज्जी जवळ येऊन हांड्याला हात लाव म्हणाली डोक्यावरचा हंडा खाली उतरवून त्याची निसटलेली फुलांची माळ परत बांधून डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन परत पंढरीची वाट चालायला लागली.का बरं कोणी पाण्याला फुलांनी साजवावं? अशेच होते सगळे वारकरी, न उलगडणारे.बरंच काही शिकवलं त्या आज्जीने मला -मानला तर दगडात बी देव आणि नाही मानला तर देव बी दगड. विलक्षण अनुभव होता आणि विलक्षण माणसं. आयुष्यात प्रत्येकाने एकदा अनुभवावी अशी वारी, अशे वारकरी आणि यांची निस्सीम भक्ती.
पुढल्या बारीला परतूनी येऊ
आता निरोप असावा
"जनी विठ्ठल दिसावा,
मनी विठ्ठल रुजवावा "🙏🏻