18/07/2019
वानिवडे गावची ग्रामदेवता श्री पावणाई देवी
वानिवडे देवगड तालुक्यातील बेटाचे गाव म्हणुन ओळखले जाणारे वानिवडे गाव व ग्रामदैवत श्री देवी पावणाई हे पुरातन काळापासुनचे एक जागृत दैवत आहे. लोकवस्ती पासुन दुर असणारी देवी भक्तांच्या नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. मूर्ति काळ्या दगडात कोरलेली आहे. तिच्या हातात ढाल, तलवार, गदा अशी शस्त्रे आहेत. घाडी मंडळी रोज या देवीची पुजा करतात.
एकबाजुस डोंगर व दुसऱ्या बाजुने वाहणारी खाडी या मध्ये वानिवडे गाव वसलेलं आहे. डोंगरावर देवीचे मंदिर असल्यामुळे संपुर्ण गावचा विचार करता ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे. व गावच्या डोक्यावर विराजमान होऊन पुर्ण गावावर तिची क्रुपाद्रुष्टी आहे. तसेच हे मंदिर सपाट कातळ जमिनीवर आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे. त्यामुळे निसर्ग सानिध्याने नटलेलं आहे. मंदिर परिसराच्या आजुबाजुस लोकवस्ती नाही आहे गावापासुन जवळजवळ २ कि.मी अंतरावर दुर आहे. आजुबाजुला कुठेच पाण्याचा स्त्रोत नसताना मंदिराच्या शेजारी मात्र गुहेच्या आकाराचे तळे असुन त्याला मात्र पुष्कळ थंडगार पाणी आहे व ते सहज हाताने काढण्यासारखे आहे. पूर्वी मंदिर फार जुने व कौलारू होते. या मंदिराच्या चौथऱ्यावर शके १८७६ अशी अक्षरे कोरलेली होती. आता मात्र गावकऱ्यांनी व भाविक भक्तांनी एक सुंदर देखणे मंदिर उभारले आहे. मंदिराच्या बाहेर उभे राहिले असता मोंड ,टेंबवली गावची मंदिरे सहज द्रुष्टीस पडतात. वानिवडे गावची देवी पावणाई देवी हे प्रमुख ग्रामदैवत असुन आकारी ब्राम्हण,देवी भावई,देव ईश्वर व सत्पुरुष अशी लहानमोठी मंदिरे या मंदिर परिसरात आहेत. देवी भवानी दसरोत्सवात देवी पावणाईच्या उजव्या बाजूला विराजमान होते. त्यानंतरच दसरोत्सवाची घटस्थापनेने सुरवात केली जाते. गावातील बारापाचाचे मानकरी व गावकरी मिळुन प्रबोधिनी एकादशी दिवशी हरीनाम सप्ताह, दसरा, होळी आणि अन्य उत्सव साजरे करतात.
देवळाचा वर्धापनदिन वसंतपंचमीला उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात गोवा आणि मुंबईतील लोक आवर्जुन सहभागी होतात. यावेळी आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक येतात. गावातील माहेरवाशीनि आवर्जुन दरवर्षी देवीची खणानारळांनी ओटी भरतात. या मंदिराला फार मोठा इतिहास आहे. देवीने कौल देऊन अनेक अडचणी सोडवल्याचे मानकरी सांगतात. तिच्या अनेक आख्यायिका आहेत.
वानिवडे गावची श्री. देवी पावणाई देवता ही बारा वाडीची ग्रामदेवता आहे. हिचा उगमस्थान गावात न होता सड्यावर जिथं जळवाडी परिसरामध्ये विराजमान झालेली पावणाई देवता आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आकार मर्याद असते. फक्त वानिवडे गावची श्री. देवी पावणाई ही तीन आकार मर्याद आहे. म्हणून त्या देवतेच्या स्थळातून एखादा भूत काढून पाठवला असता त्यासाठी एखाद्या माणसाने गोनभर नारळ संपवले तरी ते भूत मागे येणार नाही. कारण पान ठेवताना एकाच मर्यादेस पान ठेवणार एका आकारास पान ठेवून भूत परत येत नाही. म्हणून ज्यावेळी तीन आकार मर्यादेस पान ठेवले त्याचवेळी भूत मागे येईल. अशी तीची ख्याती आहे.
पूर्वी सौराष्ट्राच्या वेळीला वानिवडे गावची श्री. देवी पावणाई श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे गेली असता त्या ठिकाणी दरवाजा बंद होता. तो खुनी पावणाई देवीने बाजूला करून पुढील दरवाजा उघडला म्हणून आजही श्री. देवी पावणाईला पुढच्या दरवाने मान आहे. बाकीचे जे देव महाशिवरात्रीला श्री.क्षेत्र कुणकेश्वराला भेटायला येतात. त्यांना मागून प्रवेश आहे. ते मागच्या दरवाजाने प्रवेश करतात. ते सभामंडपामधून प्रवेश करू शकत नाही. त्याच्यानंतर वानिवडे गावची श्री.देवी पावणाई देवीच्या दृष्टांताबाबत अनेक दाखले दिले जातात.
विजयदुर्ग किल्ल्यावरील सेनानी धुळप यांच्या पागेतील घोड्यांना 'गोचिड' या पिसवांचा उपद्रव होत होता. धुळपांनी अनेक देवदेवतांना नवससायास केले. हुशार वैद्यांकडून औषधोपचारही केले. मात्र त्याचा काही उपयोग होत नव्हता. घोडे मात्र दिवसेंदिवस या आजाराने खंगत चालले होते. काहीही गुण येत नसल्याचे लक्षात येताच धुळपांनीही हात टेकले.
वानिवडे गावच्या पावणाईची ख्याती धुळपांच्या कानी गेल्यावर धुळपांनी पावणाईला साकडे घातले. त्यावेळी देवीने किल्ल्यावर जाऊन धुळप राजाला सांगितले. आधी सर्व माझ्या देवतेंना सोड तर मी सर्व 'गोचिड व पिसवांपासून मुक्त करेन तुझ्या घोड्यांना देवीने सांगल्याप्रमाणे देवतांच्या च्या बंदिमधून मुक्त केले.
वानिवडे गावच्या श्री. पावणाई देवीने धुळप राजाच्या घोड्यांच्या गोचिड व पिसवांना पाण्यासारखे उतरवले. व हे संकट दूर केले. त्यावेळी धुळप राजांनी देवी पावणाई या देवतेची खणानारळाने ओटी भरली व रयतेसह मोठा उत्सव साजरा केला. धुळप यांनी नवसाची परतफेड म्हणून देवीला एक मशाल व पंचारती भेट दिली या दोन्ही वस्तु मंदिरात आहेत धूळप यांनी मंदिराला जमीनही इनाम दिली.
कथा - पेज - देवाचा " गड " देवगड.